मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:120/121: 11112025 "

"विचार शृंखला:120/121: 11112025 "

 120)  "  कर्तव्याची जाणीव तीव्रतेने जतन केली की, काम कोणतं करतं आहोत, हा विचार गौण ठरतो. फक्त कामच करायचं ठरवलं की मोजकी कामं केल्यावर इतर कामं आपण नाकारू शकतो. आवडीच्या कामाला प्राधान्य दिलं जातं. ते कामही पुरून उरण्याईतक असतं. आणि तरीही जी कामं राहतात किंवा आपण टाळतो त्यासाठीच हाकाटी सुरु होते. संसारासाठी राबूनही श्रेय हरवून बसावं लागतं. काम आणि कर्तव्य ह्यातला फरक नेमकेपणाने समजावा लागतो. " 

 121)  " मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येतं नाही. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमाकाळ जपतो. मागच्या-पुढच्या क्षणाचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही. " 

वपूर्झा/सुरेंद्र/11112025

                                                        

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:118/119: 09112025 "

"विचार शृंखला:118/119: 09112025 "
 118) " जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे ते निराकार आहे. जे निराकार असतं ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्न तशीच असतात. ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येतं नाहीत. स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत. छायाचित्रं सप्तरंगात कोंडता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो, त्याच नाव अंतरंग. "
 119) " काही माणसांचा व्यवसायच असा असतो की त्याला काळवेळेचं शेड्युल नसतं. म्हणूनच अनियमित वेळापत्रकाच्या माणसाला सांभाळायचं असेल, तर कुटूंबातल्या इतर माणसांना काटेकोर दिनाचर्या हवी. " 
 120) " संशयी माणसं ' ट्यालेंटेड ' असतात असं मुळीच समजू नका. तसं असतं तर संसयी वृत्तीच्या एकूण एक माणसांना समजलं असतं की, आपल्या जोडीदाराला निव्वळ प्रेम करून आपल्याला जिंकता आलं असतं. संशयाच्या बेडीपेक्षा प्रेमाची बेडी तोडणं फार कठीण असतं."
वपूर्झा/सुरेंद्र/09112025
                                                            

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:116/117: 08112025 "

"विचार शृंखला:116/117: 08112025 "

 116)  "  नाण्याचा खानखणीतपणा जाणायला वरचा अधिकारी जाणकार हवा. तो करप्ट असतो. त्याची खानखणीतपणाची व्याख्या वेगळी असते. तरीदेखील मनात येतं की, करप्ट ऑफिसरही परवडला. खालेल्या पैशांशी तरी तो ईमानी असतो. एखादा बिनडोक जेव्हा वरची जागा मिळवतो, तेव्हा तो हाताखालच्या माणसांनाच नालायक ठरवतो.    निगरगट्टानचं नुकसान परमेश्वरही करू शकत नाही म्हणतात, त्याप्रमाणे सगळं ऑफिस अशा दगडला शेंदूर फासून कुर्निंसात करतं. " 

 117)  " पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असंच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस!पण कापरासारखं जळणं नको. ह्याचं कारण मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, मागे काहीतरी राहायला हवं. त्या राखेतून काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. " 

वपूर्झा/सुरेंद्र/08112025

                                                            

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला: 114/115: 07112025 "

" विचार शृंखला: 114/115: 07112025 "

 114)  "  नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात. " 

 115)  " खुर्ची म्हणजे काय? खुर्ची म्हणजे कर्तव्य. खुर्ची म्हणजे वसा. प्रत्येक खुर्चीचा एकेक वसा असतो. तो खुर्चीबरोबर पतकरावा लागतो. माणसं त्यातली फक्त खुर्ची उचलतात, वसा विसरतात. खुर्ची मिळाली की उततात, माततात, घेतला वसा टाकून देतात. लोककल्याण जितक्या मार्गांनी करता येतं तेव्हड्या खुर्च्या निर्माण केल्या जातात. एखादा मार्ग नव्याने दृष्टिक्षेपात आला तर खुर्च्यांची संख्याही वाढवली जाते. माणसं लगेच त्या नव्या खुर्चीसाठी वर्णी लावतात, आणि वसा विसरतात. इथं खुर्ची काय करणार/ "

 116)  "  प्रकाश हा प्रकाशच असतो. त्याबद्दल दुमत नाही. संधीपर्काशाबाबत मतभेद संभवतात. पण आपल्या या लोकशाहीत प्रकशाला पण संधी शोधावी लागते. "

वपूर्झा/सुरेंद्र/07112025

                                                            

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:113:05112025 "

" विचार शृंखला:113:05112025 "

 113)  " आपण सगळे किती तेच-तेच जगतो, असं तुम्हाला कधी वाटलं नाही? झोपणं-उठणं, तोंड धुणं, काहीतरी पिणं, दाढी, आंघोळ, प्रातरविधी, नोकरीं.... झालं ह्यात नवीन काय? शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं, शरीराला जपायचं. मन बोबलत राहयलं तरी ते मारत राहायचं. एवढसं कुठं कुसळ गेलं तर डॉक्टर कडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात. तो सल कुणी काढायचा? आपण फार बोअर झालो आहोत. पैसा मिळवणे, साठवण-उडवणं- सगळं तेच! कुठेच थ्रील नाही. अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणसं शंभरी सुद्धा गाठतात. लगेच सत्कार. का? खूप वर्ष मेला नाही म्हणून ह्यचा सत्कार. कसा जगला? तर बंधन पाळत. बंधन पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणंच. शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून! "

वपूर्झा/सुरेंद्र/05112025

                                                            

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:112:04112025 "

" विचार शृंखला:112:04112025 "

 112)  प्रत्येक वेळेला रडणाऱ्याच सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो.ज्योतीपेक्षा समई जास्त तापत नाही का? दोन माणसांना जवळ आणू या, असं निव्वळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येतं नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे रंग दुसऱ्या रंगात चांगले एकरूप होतात. ह्याला कुणी ' का? ' म्हणून विचारलं, तर काय सांगायचं? 

वपूर्झा/सुरेंद्र/04112025

                                                            

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला :111 : 03112025 "

विचार शृंखला :111 : 03112025

 111)  एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घावा. मग लक्षात येतं की, आपण गाभूळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटतं नाही, कारण परिथितीने दिलेले चटके सोसतांनाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही, तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला 'बाळपणीचा सुखाचा काळ ' स्वतः बरोबर कधी नेला कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. वितीदांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहूर नाही. ........ त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत. " 

वपूर्झा/सुरेंद्र/03112025