गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

"  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

                           000o000

                "  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म. आयुष्य एक सातारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं, हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बिजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.  त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात. पैशाशिवाय. पक्षांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एकातरी पक्षाची हाउसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर अनेक अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपणहोऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतल हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.

वपुर्झा /151/Surendra / 03042025

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

" पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

                           000o000

                "  आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळाच इंद्रिय लागतं. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसंच निराळी. चार बुके शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी कधी मांडून ठेऊ असं होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात."

वपुर्झा /148/Surendra /02042025

" अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

"  अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

                           000o000

                "  कुवतीनुसार कलावंतांसाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खरं तर छोटी माणसं, मोठी माणसं असं काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की नुसतं ' राम ' हे नाव मोठ? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तुने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेले काम करायला हवं. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनाचा शोध लावणारा 

वॅट मोठा, हे कोण नाकारून? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅटपेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो असं रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्सपायी आपली साधी साधी कामं कशी रखडतात, हे आठवून पहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामं कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचंही स्मरण ठेवावं." 

वपुर्झा /147/Surendra / 01042025

रविवार, ३० मार्च, २०२५

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

                           000o000

                "  मिळालेला लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा दाराशी आल्याप्रमाणे. त्याचा लगाम हातात धरला की मग कायम युद्ध. हे युद्धाचं आव्हान व्यवसाय स्वीकारणारा पेलू शकेल का? वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही.

पहिलच पाऊल - शब्द

दुसर - वेळ

तिसरं - तत्परता 

चौथ - नजर 

पाचव - कौशल्य 

सहावं -  ज्ञान 

सातव - सातत्य 

          सातव पाऊल हे फार अवघड पाऊल. सातव पाऊल सतराव्या, सातशेव्या, सात हजार.. .. थोडक्यात शून्य वाढवत जायचं. पत्करलेल्या व्यवसायात सातत्य टिकलं तर पहिल्या सहा पावलांना, बळीच्या तीन पावलांची शक्ती प्राप्त होते. पहिल्या सहा पावलांसाठी गुरु भेटू शकतो. सातव पाऊल रक्तात हवं."  

वपुर्झा /147/Surendra /31032025

गुरुवार, २७ मार्च, २०२५

"साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

" साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

                           000o000

                "  पारितोषिकं, प्रशस्तिपत्रकं, कप, पेले, सुवर्णपदक, म्हणजे यश नव्हे. ती कीर्ती, यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, श्वासाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसंच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेटसमोर उभं राह्यलं की प्रत्येक बॉलंच काहीतरी करावं लागतं. ' भूत, वर्तमान, भविष्य म्हणजे तीन स्टॅम्पस ' असं एक क्रिकेटिअर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणं, थांबवणं, टोलवण यांपैकी काहीतरी एक करावच लागतं. तुम्ही जर बॉलर्स ऍण्डला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळा प्रमाणे इथं पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये म्हणून जपायच असतं. साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडूंबरोबर खेळतांना पहावं लागेल."

वपुर्झा /146/Surendra /28032025

मंगळवार, २५ मार्च, २०२५

" मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

"  मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

                           000o000

                "  नोकरी करता तेव्हा तुम्ही काय करता ! जातीने - गोतीने  एक नसलेल्या वरिष्ठाला मनातून शिव्या देत, प्रत्यक्षात तुम्ही माना वाकवताच ना ! त्याची प्रसंगी मुर्खासारखी बोलणी सहन करताच ना! अपराध नसतांना शिक्षा सहन करताच ना! मग तशीच थोडी पॉलिसी घरी का वापरू नये? दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठीच! द्या थोडा मोठेपणा घरातल्यांना! एवढ काय नुकसान होणार आहे त्याने? घरातल्या माणसांशी असं दुटप्पी वागण्याची वेळ येऊ नये हे मान्य, पण दुर्दैवाने माणसं तशी भेटली तर काय इलाज? त्या मोठ्या माणसांचे स्वभाव तसे का बनत गेले त्यालाही काही कारणं आहेत, इतिहास आहे. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनीही झगडा दिला आहे, पराभव पचवले आहेत. हे सगळं कुणी पहायचं? याचा विचार कुणी करायचा? मी एकट्याने! कारण मला बायकोही हवी आणि आईही हवी, हा माझा दोष! मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे. तिच्या स्वभावातल्या गुणांपेक्षाही तिच्यात ह्या वयात निर्माण झालेले दोष मला जास्त माहीत आहेत. त्या दोषांसकट तिला कुणीतरी सांभाळायला हवं आहे. सगळ्यांच व्यवस्थित होणार आहे. आईच्या मार्गाने आई जाणार आहे. पत्नी चाललीच आहे. लोंबकळतो काय तो मीच ! "


वपुर्झा /145/Surendra /26032025

रविवार, २३ मार्च, २०२५

" आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

"  आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

                           000o000

                "  ' मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ' ह्या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे, नाक उडवून ' ही फक्त थिअरी  आहे,' अस म्हणून तिला तिला निकालात काढता येतं. पण चार पावलं जर त्या दिशेने टाकून पाहिली तर, आपल्यापुरती ती ' थिअरी ' राहत नाही. प्रथम थिअरी नाकारायची नाही. ती जगायची. त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची थिअरीला जोड द्यायची. मग तिला प्रत्ययाचं बळ येतं. ती  थिअरी इतरांना सांगत बसायचं नाही. कारण प्रचीती आली की ती तुमची तत्व होतात आणि तुमची तत्व इतरांची थिअरी होतात. अस का? कारण अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो. प्रवासाला निघतांना, केवळ कागदावर छापलेला रोड मॅप मिळतो. विश्रामधाम, गाव, पेट्रोलपंप, त्यांच्या जागा आणि मैल, इतकंच त्याच्यावर छापतात. रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हर कसा आहे, ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार, दुर्दैवाने वाटेत दरोडा पडला तर, अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत. नकाशा म्हणजे थिअरी   समजा, प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते." 

वपुर्झा /144/Surendra /23032025