" श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत."
000o000
" महाराज किंवा सिद्ध पुरुषांचीच उदाहरणं कशासाठी हवीत? आपले मित्र, नातेवाईक, पत्नी, पती, आपली स्वतःची मुलं, ह्यांच्या समस्या, गाऱ्हाणी, अडचणी ऐकतांना आपल्याला काही त्यांच्या पातळीयर्यंत जाता येत नाही. त्यांची समस्या सोडवण अंतरावरच राहतं. त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, हे शांतपणे ऐकून घ्यायलाही आपल्याला सवड नसते किंवा इच्छा नसते. ' काय करणार?' माणसाचा स्वभाव बदलतो का? ' तुम्ही सहन करायला शिका ' असं सांगणं म्हणजे एक तर पळवाट झाली किंवा आपली तेव्हडी कुवत नाही, हाच त्याचा अर्थ झाला. ऐकणारा माणुसही मग कधी कधी, ' तुम्हाला नुसतं सांगायला काय जातं? चार दिवस माझ्या घरी या आणि ' बायकोच्या ' किंवा ' नवऱ्याच्या ' सहवासात राहून दाखवा' -असं म्हणतो. ह्या त्याच्या पत्रिपादनातच आपण त्यांच्या पातळीयर्यंत जाऊ शकलो नाही, असा अर्थ होतो. ह्याचं एका कारणासाठी एखादी प्रिय व्यक्ती ' हे जग सोडून गेली' तर' आत्मा अमर आहे ' ह्या आध्यात्मिक पातळीवरचं समर्थन सात्वनापर्यंत पोचत नाही. गड्या, आयुष्य खूप साधं असतं. कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.' म्हणजे नेमक काय करायचं? ' परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेलं आहे. अंतर्मनातल्या वीणेवर तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं "
वपुर्झा /170/Surendra /23052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा