शनिवार, ३१ मे, २०२५

' सर्वेSपि सुखिन: संतु '

  ' सर्वेSपि सुखिन: संतु '

                           000o000

                " आपल्या समोर छोटी छोटी संकट येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हातरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्यर्य व्यक्त करतो की, ' अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं', पंचवीस- पंचवीस वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात, ' ह्या वयात? घटस्फोट? मग पंचवीस वर्ष काय केलं?'. पंचवीस वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. आंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटच्याच दिशेने सुरु होतो. पंचवीस वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका, कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला ' मंगळ ', कुणाचा ' वक्री राहू ' असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचीती नसतांनाही वाटतं, ' सर्वेSपि सुखिन: संतु '. "

वपुर्झा /179/Surendra /31052025

गुरुवार, २९ मे, २०२५

" भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो."

"  भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो."

                          000o000

                "  भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो. तेच थोड्याफार प्रमाणात बौद्धिक स्तरावर घडतं. निव्वळ शारीरिक सुखाच्या बाबतीतली माणसं आपण सोडून देऊ. भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवासी मिळाल्यावर त्याच्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली रे झाली की त्यातलं नावीन्य संपत. मग दुसऱ्या माणसाचा शोध. या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं मागे पडतात. प्रत्येक नव्या ओळखीच्या बाबतीत ह्या माणसाकडून नवी ओळख मिळेल, नवे विचार मिळतील, या अपेक्षेने माणसं जोडण्याचा छन्द कायम राहतो. ह्या शोधातच सौख्य आहे. प्राप्तीत नाही. 

वपुर्झा /178/Surendra / 3052025

बुधवार, २८ मे, २०२५

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

                           000o000

                " सबंध आयुष्यभर आपण अशाच निरगाठी - सुरगाठी मारत असतो. ह्याचं एकच कारण, आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचाच वावर सातत्याने होत असतो. नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असतं, पण बदली नको असते. लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स घेऊन खरोखरच पर्यटणाला जावं, की घरातच एखादी वस्तू खरेदी करावी? धाकडदपशा दाखवून मुलांना शिस्त लावावी की गोडीगूलाबीने? तीच गोष्ट, नवऱ्याची सिगारेट सुटायला हवी असेल, तर असहकारपुकारावा, अबोला धरावा, का प्रेमाने जिंकावं? यासारखे कुठलेच प्रश्न असं की तसं, याशिवाय सुटत नाहीत. मुलांना धाक हवा, पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये. नवरा चांगला आहे, पण त्याचं व्यसन नकोय. अशा छोट्या छोट्या प्रश्नांशी सामना करतचं आपलं आयुष्य संपत. "

वपुर्झा /177/Surendra /29052025

" माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो."

"  माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो."

                          000o000

                "  दगडलाही कधी विषाद झाल्याचं ऐकीवात नाही. याचं कारण दगडाची आणि आनंदाची सुद्धा कधी गाठभेट होतं नाही. विषादाच आकलन होण्यामागे सुद्धा ते एका आनंदाच स्मरण आहे. पण कुणाच्या बावतीत? माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो. पण जड बुद्धी असलेला माणूस कधीही उदास होतं नाही. कारण आपण आहोत, त्यापेक्षा कोण होऊ शकतो, या विचाराचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. मी आनंदातच राहू शकतो, मी आनंद निर्माण करू शकतो, असा विश्वास स्वतःच्या बाबतीत ज्या माणसाला आहे, तितका तो अंतर्यामी उदध्वस्त असतो. केव्हातरी सकाळी कोवळी उन्ह पडणार आहेत, प्रकाशाचं साम्राज्य पसरणार आहे, ह्याची ज्याला खात्री आहे, अशा माणसालाच रात्रीचा अंधार जास्त भेडसावतो. ज्याला सकाळच माहीत नाही, त्याला रात्र सुद्धा प्रकाशसारखीच वाटते. " 

वपुर्झा /176/Surendra / 28052025

मंगळवार, २७ मे, २०२५

" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! '

" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! '

                           000o000

                "   खोटं बोलणं हे एकदा रक्तात मुरलं, हाडं-मांस-मज्या-- रक्तवाहिन्यांप्रमाणे ' ऐनॅटॉमी' चाच एक भाग झाला की, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करतांना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होतं नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो. ' माझ्या जिवाची सगळी लावतोड तुमच्यासाठी होतं आहे, त्याचा तुम्हाला पत्ता तरी आहे का? हे सगळं चाललंय ते कुणासाठी? असा प्रश्न घरोघरी बायका आपल्या नवऱ्यांना विचारतात. त्याप्रमाणे, " दिवसभर नोकरीं करतोय, त्याशिवाय ब्रोकरचं काम करतोय किंवा पार्टटाईम जॉब करतोय, क्लासेस चालवतोय, ही सगळी धडपड कुणासाठी करतोय? रक्ताचं पाणी करतोय. ' असली विधाने नवरेही करतात. हा सगळा बकवास आहे. रक्ताचं खरोखरच पाण्यात रूपांतर झालं, तर ते रक्तदानच. प्रत्येकजण जाता - येता RBC/ वेबच टोटल काऊंटच्या तपासण्या करून घेईल. बायकोसाठी जीव गहाण ठेवणाऱ्या नवऱ्यापासून, त्याच्या बायकोने घटस्फोट मागितला तर? ' आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! ' हे नारदाचं वचनच खरं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून वाढण्यात जोपर्यंत पत्नीला आनंद आहे, तोपर्यंतच ती तो पदार्थ करते. एकूण एक नात्यांच्या, मित्रांच्या बाबतीत हे एकमेव सत्य आहे. " 

वपुर्झा /174/Surendra /27052025(2)

सोमवार, २६ मे, २०२५

" जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

"  जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

                          000o000

                "  ' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वारायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्याचं ' हरवण, सापडणं, हुरहूर वाटणं ' हे सगळं भावविश्व स्वतंत्र असतं. या अनंत किती तरी मित्र भेटतात. ' ह्या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' असं वाटायला लावणारी अनेक माणसं, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. ' जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात. काही- काही जणांना एका ठराविक हॉटेलमधलं जेवण आवडतं. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याचं ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीतही घडतं. स्वतःच्याच सावलीवर जो भाळला, तो फसला. " 

वपुर्झा /172/Surendra / 27052025

" प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म."

" प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म."

                           000o000

                "   काही माणसं तापट असतात, काही आढयतेखोर, काही घुमी तर काही गर्व करणारी, काही ऑर्थोडॉक्स तर इतर न्यूनगंडवाली, धूर्त, लबाड, लफंगी, खोटारडी, नम्र, भिऊन राहणारी, ऐदी, आळशी, सतत उसन्या पैशावर आयुष्य रेटणारी. प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो. पाठोपाठ संघटना, युनियन. नावं संघटना पण विघटन हे त्यांचं कार्य. एकटा माणूस धार्मिक असू शकतो, पण त्याला अनुयायी म्हणजे गर्दी लाभली की तो तयार होणारा समाज धार्मिक असूच शकत नाही. "

वपुर्झा /171/Surendra /26052025

रविवार, २५ मे, २०२५

" कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

 " कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

                          000o000

                "  एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्ये पर्यंत पोचू शकत नाही. तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्ये कडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खूष होतो. हे सगळं पाहिलं की वाटतं, कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

वपुर्झा /170/Surendra / 25052025

शुक्रवार, २३ मे, २०२५

" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

"  भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

                          000o000

                "  पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला असं समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल, पहाड वेगवेगळे असतील, त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच काम सत्यत्याने करत राहतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काही तरी चुकलं असेल. पुढंच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, असं म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधमागे लागतो. विफलता हेच अध्यात्म्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे. "

वपुर्झा /170/Surendra / 24052025

" श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत."

" श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत." 

                           000o000

                "   महाराज किंवा सिद्ध पुरुषांचीच उदाहरणं कशासाठी हवीत? आपले मित्र, नातेवाईक, पत्नी, पती, आपली स्वतःची मुलं, ह्यांच्या समस्या, गाऱ्हाणी, अडचणी ऐकतांना आपल्याला काही त्यांच्या पातळीयर्यंत जाता येत नाही. त्यांची समस्या सोडवण अंतरावरच राहतं. त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, हे शांतपणे ऐकून घ्यायलाही आपल्याला सवड नसते किंवा इच्छा नसते. ' काय करणार?' माणसाचा स्वभाव बदलतो का? ' तुम्ही सहन करायला शिका ' असं सांगणं म्हणजे एक तर पळवाट झाली किंवा आपली तेव्हडी कुवत नाही, हाच त्याचा अर्थ झाला. ऐकणारा माणुसही मग कधी कधी, ' तुम्हाला नुसतं सांगायला काय जातं? चार दिवस माझ्या घरी या आणि ' बायकोच्या ' किंवा ' नवऱ्याच्या ' सहवासात राहून दाखवा' -असं म्हणतो.  ह्या त्याच्या पत्रिपादनातच आपण त्यांच्या पातळीयर्यंत जाऊ शकलो नाही, असा अर्थ होतो. ह्याचं एका कारणासाठी एखादी प्रिय व्यक्ती ' हे जग सोडून गेली' तर' आत्मा अमर आहे ' ह्या आध्यात्मिक पातळीवरचं समर्थन सात्वनापर्यंत पोचत नाही. गड्या, आयुष्य खूप साधं असतं. कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.' म्हणजे नेमक काय करायचं? ' परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेलं आहे. अंतर्मनातल्या वीणेवर तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं "

वपुर्झा /170/Surendra /23052025

बुधवार, २१ मे, २०२५

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

                          000o000

                "  संसारात आनंदी वातावरण जो ठेवू शकतो, त्याला मी आत्मवान समजतो. मनात शांती असेल वा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे. ह्यासाठी दिनरात कोशिश करणारा अंतर्यामी शांत आहे, असं कधीच होणार नाही. संसार ही सर्वात अवघड कला आहे. प्रत्येक क्षण हा शिक्षणक्रमाचा आहे आणि ह्या क्रमातून जातं असतांनाच परीक्षा द्यावी लागते. अभ्यासक्रमाची टेक्स्टबुकं आणि नं फुटणारी प्रश्नपत्रिका एकाच वेळी हातात पडतात. बायको, वेगवेगळ्या वयाचा मुलगा आणि मुलगी, इतर नातेवाईक आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हे सगळे परीक्षक आणि ह्यातलेच काही पेपरसेंटर. काल बरोबर घेतलेला निर्णय आज चालतं नाही. डिग्री-डिप्लोमासारखे प्रकार नसल्यामुळे भिंतीवर लावायला प्रशस्तिपत्रक नाहीत. परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी आणि वेगवेगळ्या वयाच्या, वृत्तीच्या माणसांना एकाच वेळी न्याय देता येत नाही. तुम्ही जेवढे विचारवंत, तुमची स्वतःची उंची जेवढी विराट, तेवढ्या प्रमाणात तुम्ही आनंद निर्माण करू शकता. ही उंची वाढवण्याच्या खटाटोपात जो सापडतो, तो अंतर्यामी अतृप्त आणि अशांतच असणार. तरीही जो परिवारात रोषणाई करू शकतो, तो आत्मवान. प्रत्येकापाशी ही शक्ती असते, ज्योत असते. चैतन्य हीच ज्योत. श्वासोस्वास हेच सत्य. फक्त ह्या तेवणाऱ्या ज्योतीला स्वार्थत्याग आणि समर्पणाचं तेल लागतं. " 

वपुर्झा /168/Surendra / 22052025

शनिवार, १७ मे, २०२५

" ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? "

"  ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय   म्हणायचं? "

                          000o000

                "  ' हा काळा आणि हा पांढरा ' अशा दोन कप्यांत आयुष्याचे सगळे रंग भरता येत नाहीत. काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या मिश्रणाने, जो ' ग्रे ' म्हणजे ' राखाडी ' रंग तयार होतो, त्याप्रमाणे कौटुंबिक जीवनातले अनेक क्षण राखाडी रंगाचे असतात. म्हणून आपला सतत अर्जुन होतो.  नातवंडांची बाजू घेऊन मुलाला किंवा मुलीला, त्यांचं चुकलंय, हे दिसत असूनही नातवंडांना न्याय देता येत नाही. आपला मुलगा हा त्यांच्या मुलांचा बाप आहे, त्याचा पिता म्हणून जे स्थान आहे, त्याला धक्का लागू नये म्हणून            नातवंडानसमोर त्याला चार शब्द सुनवता येत नाहीत. आपण आजोबा असूनही, स्वतच्या मुलांसमोर मुलगा तुम्हाला उलट उत्तरं किंवा दुरुत्तर देऊ शकतो. त्या वेळेला आजोबांची ' आजोबा ' म्हणून जी प्रतिष्ठा आहे, ती काटेकोरपणे सांभाळण्याची गरज नसते. आई-वडिलांकडून जो न्याय मिळतं नाही, तो आजोबांकडून मिळवू, ह्या भावनेने नातवंड तुम्हाला बिलगतात. त्यांच्या विश्वास सार्थ होता, हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मुलाच्या आधारावर जगायचं असतं. नातवंडांवर अन्याय होऊ द्यायचा नसतो. ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय   म्हणायचं? "

वपुर्झा /168/Surendra / 18052025

" एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "

" एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "

                           000o000

                "   काही माणसांना चौकटीतल आयुष्य पेलत नाही. सुरक्षित वातावरणात ती कावरीबावरी होतात  त्यांना हुरहूर हवी असते. सुखद बेचैनी हवी असते. चार वळून बघणाऱ्या माना हव्या असतात. कौतुकाने, आश्चर्याने बघणाऱ्यांच्या नजरेत ह्या अशा माणसांना, त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वास्थ्याचा शोध लागतो. ' ह्यांना काय कमी आहे?' असं जेव्हा इतरांना वाटतं तेव्हा ते वाटणं शिष्टसंमत समाजापेक्षा वेगळं नसतं. ज्यांच्याजवळ कोणतीही वेगळी क्वालिटी नसते, अशीच माणसं विचित्र वागतात. ह्या अशा माणसांना फार लवकर सगळ्याचा कंटाळा येतो. ह्यांना कायम कसली तरी उब हवी असते. एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब    मिळवतात. "

वपुर्झा /165/Surendra /17052025

बुधवार, ७ मे, २०२५

" स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

"  स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

                          000o000

                "  समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक, मित्र, थोडक्यात म्हणजे ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मनं ही अशी सहजी मारता मारता, दुरभिमान स्वतचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेव्हडाच फक्त जतन केला तर वर्तुळातली माणसंही त्याची बुज राखतात. स्वाभिमानाची सोयरीक कर्तृत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला          ' पोकळ ' विशेषणचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या लहरीपाई त्याला सत्तेपुढे नामतं घ्यावं लागतं. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वयत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो.   ' स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

वपुर्झा /164/Surendra / 08052025(2)

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? "

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? " 

                           000o000

                "   शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरंचसं विसरल गेल तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा-माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताच आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या तेव्हड्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून वीस रुपयांचा नारळ, पन्नास रुपयांचे पेढे, वीस रुपयांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दोन रुपये, एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? 

वपुर्झा /163/Surendra /08052025

मंगळवार, ६ मे, २०२५

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

                           000o000

                "   प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते. प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहारही आहे. प्रेम करतानाही साथीदाराची वैचारिक पात्रता तपासायला हवी. संसार  हा स्थर्यासाठी असतो. आता स्थर्याची व्याख्या ठरवायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा. संसाराच्या प्रारंभी ह्या तीनही गरजा, मनं माराव लागणार नाही इतक्या ठणठणीत अवस्थेत भागणाऱ्या असतील तर ह्याच्यापलीकडच्या ज्या गोष्टी हव्या आहेत, ह्या सगळ्या wants आहेत. त्या needs नाहीत. मागण्या आणि गरजा इतका स्पस्ट फरक आहे हा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या किमान गरजा जो भागवू शकत नाही, त्याने मुळात लग्न का करावं? ' पुरुष ' होण्यापूर्वी त्याने ' नवरा ' आणि नंतर ओघानेच " बाप ' व्हायची घाई का करावी? वरील तीन गरजापैकी ' निवारा ' ही गरज, राज्यकर्त्यांनी इतकी इतकी महाग करून ठेवली आहे की ती घेता घेता रक्त ओकावं लागतं. ह्या एव्हड्याच एका बाबतीत पत्नीने आर्थिक सहकार्य द्यावं ही नवऱ्याची अपेक्षा गैर मानता येणार नाही. पण निवाऱ्याचा प्रश्नही सुटलेला असेल तर आडकाठी राहिली कुठे? फ्रिज, फोन, होंडा, टीव्ही, टेपरेकॉर्डर हे फॅमिली मेंबर्स विकत घेऊन सांभाळायचे असतील तर  ' फ्रिज '   वगळता बाकीच्या wants आहेत. ह्यासाठी तुमच्या जोडीदाराने तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला नोकरीची जबरदस्ती केली तर नाईलाजाने त्याच्या मंनगटात ताकद नाही असं म्हणावं लागेल किंवा त्याला रातोरात पैॅरिस बांधून हवयं म्हणावं लागेल. ह्यातला दुर्दैवाचा भाग हाच आहे. कष्ट आणि वेळ, सतत्य आणि निष्ठा ह्यांच्या पाठपुराव्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. ह्यावरचा उपवर तरुणाचा विश्वास उडत जाण हा दुर्विलास आहे. अशा माणसाच्या आयुष्यात तुम्ही एकजीव होऊ शकाल का? सगळं भवितव्य त्याच्या हातात सोपवतांना, तुमचं अगदी छोटं पण रास्त स्वप्न, लग्नाच्या होमात आहुती म्हणून टाकणार का? प्रारंभीच्या कळतलं प्रेम आंधळं असू शकत. कोणती व्यक्ती का आवडावी, ह्याला उत्तरं नाहीत. पण संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे. कालांतरानें कर्तुंत्वशून्य सहवास तुम्हाला नकोसा झाला तर? 

वपुर्झा /162/Surendra /06052025

रविवार, ४ मे, २०२५

" ........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. "

".........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

                           000o000

                "   मला हेही माहीत आहे की अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिट्यामिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत. कलमी आंबा हा मातीचाच हुंकार असतो. तशा काही काही व्यक्ती ही मातीला पडलेली स्वप्न असतात. वासुदेव बळवंत, सावरकर, लोकमान्य टिळकांपासून खरेखुरे क्रांतिकारक-विचारवंत, लता-आशा वगैरेसारख्या तीन तपांच्यावर स्वरांच्या संततधारांनी चिंब करणाऱ्या           पार्श्वगायिका, बडे गुलामअलीखापासून  पं. भीमसेन जोशीपर्यंतचे गायक, बाबा आमट्यानंपासून शिवाजीराव पटवर्धनांपर्यंत खरेखुरे मानवतेचे पूजारी, अशी सगळी माणसं पहिली की ' सुजलां सुफलां ' चा अर्थ सापडतो. राहलेल्या सगळ्या जनगणात जमिनीत फाळ खुपसणारे आहेतच. पण जेव्हा जमिनीलाच प्रसववेदनांचा मोह होतो, देठालाच जेव्हा रोमांच आवरेनासे होतात तेव्हा कळीचा हुंकार उमटतो त्याप्रमाणे धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

वपुर्झा /161/Surendra /04052025(3)

शनिवार, ३ मे, २०२५

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. "

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

                           000o000

                "   पंचवीस वर्षांपूर्वीच्या चुका मान्य करतांना आपल्याला काही वाटतं नाही  काळ फक्त सगळ्या दुःखावरच इलाज नसतो तर चुकांवरही असतो. काल जर आपण एखाद्याचा अपमान केला, तर आज दिलगिरी दर्शवण जड जातं. काही माणसांजवळ लगेच चुका मान्य करण्याचा मोकळेपणा असतोही. तरी ती गप्प राहतात. का? एकच कारण. मोकळी होणारी मनं खूप अडतील. मोठ्या मनाची माणसं भेटतील न भेटतील. ह्या शंकने ती गप्प राहिली असतील, स्वतःचं मनं कुरतडत असतील.  समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

वपुर्झा /160/Surendra /04052025

" भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

"  भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

                          000o000

                "  परिवर्तन ही अंतर्मनातलीच प्रोसेस आहे. लाऊडस्पीकर्स लावून, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात प्रार्थना म्हणणं, हा राजकारणाचा भाग आहे. भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत. बाहेरच्या कोलाहलापासून लांब गेलो म्हणजे तुम्हालाच तुमचा सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू येऊनही जी माणसं तिकडे दुर्लक्ष करतात, त्यांना गुरु किंवा  सायक्रॅटिस्ट लागतो "

वपुर्झा /160/Surendra / 03052025(2)

"माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

" माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

                           000o000

                "  माणूस कशाच्या आधारावर जगतो सांगू? भूतकाळातल्या आठवणीवर! " ' ही निव्वळ कविकल्पना!. आयुष्य आहे म्हणून जगतोय हे उत्तरं फार रुक्ष वाटेल ह्या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो, आठवणींवर जगतो म्हणून! आठवणी जीवन देण्या इतक्या तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी. आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात. इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत, रडगाणी गात आयुष्याशी कोम्पर्माईज करतात " 

वपुर्झा /159/Surendra /03052025

शुक्रवार, २ मे, २०२५

" जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात "

"  जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात " 

                          000o000

                "  कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, का येईल, तसंच का, वेगळं का नाही, एका ठराविक प्रसंगी त्या त्या व्यक्तीने तसेच निर्णय का घेतले ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. आधी घटना घडतात. प्रश्नमाला नंतर तयार होतात. इट इज जस्ट लाईक पोस्ट-मार्टेम. प्राण गेला हे खरं. चिंकित्सा नंतर.  निश्चित कशाने मेला ह्याचं अचूक उत्तर मिळाल्याने प्राण थोडाच परत येतो? जिव्हाळ्याच्या  वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात " 

वपुर्झा /157/Surendra / 02052025

गुरुवार, १ मे, २०२५

" संसार टिकतो तो कसा?"

" संसार टिकतो तो कसा?"

                           000o000

                " संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात, आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं तेव्हा घर उभं राहतं. "


वपुर्झा /156/Surendra /01052025