" नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो."
000o000
" वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातला त्यात दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. झाडाझुडपात फुलं जशी उगवतात तशी ती बघायची नाहीत. वेगवेगळ्या आकाराची भांडी आणायची. त्या भांड्यात बाणांची शय्या करायची. आणि मग कर्दळीच्या पानापुढे निशिगंधाला ताटकळत ठेवायचं, आणि आफ्रिकन लिलीच्या घोळक्यात गुलाब रोवायचे. त्या काट्यानंच्या शय्येवर फुलांना. डुलायला लावायचं. म्हणायचं इकेवाना. तशी जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. त्या दुःखाचा इकेवाना करायचा. झाडं तसं करत नाहीत. फुललेल्या फुलाच्या पाकळ्या गळत असतांनाच इकडे देठाला नवा हुंकार उमटत असतो. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हताप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही, सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो.
वपुर्झा /96/Surendra /13062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा