विचार शृंखला :111 : 03112025
111) एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घावा. मग लक्षात येतं की, आपण गाभूळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटतं नाही, कारण परिथितीने दिलेले चटके सोसतांनाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही, तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला 'बाळपणीचा सुखाचा काळ ' स्वतः बरोबर कधी नेला कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. वितीदांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहूर नाही. ........ त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत. "
वपूर्झा/सुरेंद्र/03112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा