" प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते "
000o000
" प्रेमात पडल्यावर संकेत स्थळी भेटणे ओघानेच आले. दिवसाच्या 24 तासापैकी दोन-तीन तास एकमेकांना भेटत असतील. ह्या दोन तीन तासांच्या भेटीत परस्परांना न दुखवण्याची पराकाष्ठा चालते. सतरा-अठरा तास भेटीसाठी वाट पाहण्याचा टॅक्स भरलेला असतो आणि पुन्हा तितक्याच तासांची प्रतीक्षा करायची शिक्षा असते. त्यामुळे ह्या चुटपुटत्या भेटीत फक्त एकमेकांना सुखी करण्याची आश्वासन दिली- घेतली जातात. निरीक्षणतच दंग असलेले जीव परीक्षणासाठी मोकळे राहतच नाहीत हाच कालखंड अभ्यासाचा आहे. ह्या अभ्यासात आपला जोडीदार आपल्याशी कसा वागतो ह्याचाच केवळ अभ्यास करून चालणार नाही. मित्र-मैत्रिणी, वडीलधारी माणसं, घरातले नोकरचाकर, हॉटेलातले वेटर्स, रेल्वेतले सहप्रवासी, टॅक्सी-रिक्षावाले, नातेबाईक, दुकानदार, थोडक्यात म्हणजे संसाराला प्रारंभ केल्यावर ज्या ज्या व्यक्तीचा समाजात समावेश होतो त्या सर्वांशी त्याचं वागणं कसं आहे ह्याचं अवलोकन तुम्ही करायला हवं. कारण दैनंदिन व्यवहार ह्या सगळ्या घटकांवरच अवलंबून असतो. सुख आणि संवाद ह्या तराजूत तोलून खरेदी करण्याच्या वस्तू नव्हेत. प्रपंच करणाऱ्या माणसाचा आनंद ह्या ना त्या रूपात व्यवहारातच गुंतलेला असतो. व्यवहारासारखी परखड गोष्ट, सुसंवादनेच सुलभ होते. ह्या सुसंवादाच वेड, छंद तुमच्या जोडीदाराला आहे कीं नाही, ह्याचाच कसून शोध घ्या. वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींशी बोलतांना तुमचा सखा, त्या त्या गोष्टी जोडत जोडत व्यवहार साधतो की मोडतोड करीत कार्यभाग उरकतो ते पाहा. बारीकसारीक गोष्टीतूनच देवगण, माणुसगण, राक्षसगण प्रकट होत असतो. निरीक्षणशिवाय, परीक्षणाशिवाय लक्षण- अवलक्षणांचा अभ्यास अशक्य. हे आवश्यक आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती ' प्रिय ' असेल तेच बोलते. प्रिय असेल तेव्हढच बघते, ऐकते, स्पर्शून घेते ' प्रियकर ' म्हणजे आदर्शवाद. ' माणूस' म्हणजे वास्तववाद.
वपुर्झा /155/Surendra /30042025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा