" यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी."
000o000
" अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? मला तसें वाटतं नाही. अपयश आलं कीं अवतीभोवतीच्या, प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते, कंठ फुटतो, कीं त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकू येत नाही. यश मिळाल कीं, गळा दाटून येतो. अपयश मिळालं कीं, गळाच दाबला जातो. अपयश पचवायला शिकायचं म्हणजे, स्वकीयांनीच केलेल्या वार पचवायला शिकायचं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा फुंकर किंवा फुत्कार पारखायची शक्ती वाढवायची, अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो ह्या सत्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची. यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी. सतत अस्तित्व दर्शवणारी. रांगोळीचा भुकेशी संबंध नाही. म्हणूनच ती पचवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारखं. अन्नावर वासना नसली तरी ते वाढणं गिळावं लागत. पचवावं लागतं. चेहऱ्याची रांगोळी विस्कटू न देता. "
वपुर्झा /152/Surendra / 15042025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा