बुधवार, ३० एप्रिल, २०२५

" प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते "

"  प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते "

                           000o000

                "  प्रेमात पडल्यावर संकेत स्थळी भेटणे ओघानेच आले. दिवसाच्या 24 तासापैकी दोन-तीन तास एकमेकांना भेटत असतील. ह्या दोन तीन तासांच्या भेटीत परस्परांना न दुखवण्याची पराकाष्ठा चालते. सतरा-अठरा तास भेटीसाठी वाट पाहण्याचा टॅक्स भरलेला असतो आणि पुन्हा तितक्याच तासांची प्रतीक्षा करायची शिक्षा असते. त्यामुळे ह्या           चुटपुटत्या भेटीत फक्त एकमेकांना सुखी करण्याची आश्वासन दिली- घेतली जातात. निरीक्षणतच दंग असलेले जीव परीक्षणासाठी मोकळे राहतच नाहीत  हाच कालखंड अभ्यासाचा आहे. ह्या अभ्यासात आपला जोडीदार आपल्याशी कसा वागतो ह्याचाच केवळ अभ्यास करून चालणार नाही. मित्र-मैत्रिणी, वडीलधारी माणसं, घरातले नोकरचाकर, हॉटेलातले वेटर्स, रेल्वेतले सहप्रवासी, टॅक्सी-रिक्षावाले, नातेबाईक, दुकानदार, थोडक्यात म्हणजे संसाराला प्रारंभ केल्यावर ज्या ज्या व्यक्तीचा समाजात समावेश होतो त्या सर्वांशी त्याचं वागणं कसं आहे ह्याचं अवलोकन तुम्ही करायला हवं. कारण दैनंदिन व्यवहार ह्या सगळ्या घटकांवरच अवलंबून असतो. सुख आणि संवाद ह्या तराजूत तोलून खरेदी करण्याच्या वस्तू नव्हेत.   प्रपंच करणाऱ्या माणसाचा आनंद ह्या ना त्या रूपात व्यवहारातच गुंतलेला असतो. व्यवहारासारखी परखड गोष्ट, सुसंवादनेच सुलभ होते. ह्या सुसंवादाच वेड, छंद तुमच्या जोडीदाराला आहे कीं नाही, ह्याचाच कसून शोध घ्या. वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींशी बोलतांना तुमचा सखा, त्या त्या गोष्टी जोडत जोडत व्यवहार साधतो की मोडतोड करीत कार्यभाग उरकतो ते पाहा. बारीकसारीक गोष्टीतूनच देवगण, माणुसगण, राक्षसगण प्रकट होत असतो. निरीक्षणशिवाय, परीक्षणाशिवाय लक्षण- अवलक्षणांचा अभ्यास अशक्य. हे आवश्यक आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती ' प्रिय ' असेल तेच बोलते. प्रिय असेल तेव्हढच बघते, ऐकते, स्पर्शून घेते  ' प्रियकर ' म्हणजे आदर्शवाद. ' माणूस' म्हणजे वास्तववाद.


वपुर्झा /155/Surendra /30042025

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

" ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

"  ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

                          000o000

                "  तुमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र पचवण आलं आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा धोंगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेवढच जग नाही. हे जग अजून चाललंय. ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

वपुर्झा /155/Surendra / 29042025(2)

" कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात."

"  कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात."

                           000o000

                "  प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेव्हड्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते. एकाच फ्रिकवेन्सिवरची.नाहीतर एकदम साधी, अनभिज्ञ, चटकन थक्क होणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला एखाद्या पुस्तकाबद्दल सांगतांना उजळणीचा आनंद मिळतो. आपण किती लक्षात ठेवलंय, ह्याचा अंदाज येतो आणि जिथे जिथे थक्क झालो, विचारात पडलो, अस्वस्थ झालो ती ती सगळी स्पंदन समोरच्या व्यक्ती बरोबर पुन्हा जगता येतात. ' ही किती अफाट व्यक्ती आहे' असा भाव दुसऱ्याच्या डोळ्यात        तरंगताना दिसल्याशिवाय, केलेल्या व्यासंगला कोंडणं मिळत नाही. बुद्धीवान माणसाची तीही एक गरज असते. म्हणूनच कीं काय, कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात.

वपुर्झा /153/Surendra /29042025

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

" आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो."

"  आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो." 

                          000o000

                " सौदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौदंर्याने चमकत असतो. कष्ट हे सौदंर्य बुद्धी हे सौदंर्यचंच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौदंर्य, आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरूपता. समोरच्या चालत्या बोलल्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो." 

वपुर्झा /155/Surendra / 22042025

"क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात."

" क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात."

                           000o000

                "  शंभरपैकी नव्याणव कुटुंबातून ह्याचं कहाण्या घडतात. म्हणूनच सगळी सुबत्ता असून, नजर लागेल अशी परिस्थिती असूनही माणसं चिंतेत असतात. " " घरात, संसारात येणाऱ्या नव्या व्यक्तीकडे, म्हणजेच सुनेकडे बघतांना सून किंवा बायको किंवा वहिनी म्हणा, भावजय म्हणा - जे नातं असेल ते - प्रत्येकजण एक इमेज तयार करतो. ती इमेज तयार करतांना त्या मुलीच्या वागणुकीचा, हावभावांचा, एखाद्या कॅमेऱ्यासारखा फोटो घेतला जातो. तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन कोणत्याही कृतिमागची संवेदना कुणीही जाणून घेत नाही. प्रत्येकाचं स्वतःने तयार केलेल्या इमेजवर प्रेम बसत. त्या प्रेमापाई, प्रत्यक्षात वावरणारी व्यक्ती उध्वस्त झाली तरी फिकीर नाही, पण स्वतः तयार केलेली चुकीची प्रतिमा अभंग राहील अशी धडपड कुटुंबातली माणसं करतात. कारण त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा खोटी निघाली तर त्यांच्या स्वतःच्या भूमिकेला तडे जातील, ते स्वतः उध्वस्त होतील अशी त्यांना भीती वाटते.  ही अशी माणसं भ्याड असतात. क्रियाशून्य असतात. क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात. अशी माणसं कळप करून जगतात आणि सतत कार्यरत असणारा माणूस ' चुकतो कधी?' - ह्याची वाट पाहतात. दुर्दैवाने जर अशी कर्तृत्वशून्य साथ आणि आळसापायी आयुष्य, तारुण्य वाया घालवणारी संतती वाट्याला आली तर एखाद्या बाणेदार स्त्रीने काय करावं? अशा नादान माणसांसाठी तिला आयुष्यभर खपावं लागतं. तशी ती राब राब राबते. पण ते करतांना तिला  प्रक्षोभ आवरता येत नाही. ती वाक्ताडन करते आणि श्रेय गमावते."

वपुर्झा /154/Surendra /21042025

रविवार, २० एप्रिल, २०२५

" ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

"  ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

                          000o000

                "  आयुष्यात, संसारात ज्यांना काहीही घडलेलं चालतं, त्यांच्यासमोर काही समस्या नसतात. कॉफी कीं चहा इतक्या साध्या, ऐहिक गोष्टीपासून ज्या माणसांना विशिष्ट गरजा आहेत, आवडनिवड आहे, त्यांच्या समस्या रोज जाग आल्यापासून सुरु होतात. त्यात पुढे मग दुधाचं प्रमाण किती, टॅम्परेचर किती, ब्रँड कोणता.... एक न संपणारी किंवा कुठून सुरु झाली, ह्याचा पत्ता लागू न देणारी मुंग्याची रांग. ही रांग जेव्हा वैचारिक भूमिकेपर्यंत जाऊन पोचते आणि अग्रहक्क मागू लागते तेव्हा डोक्याचं वारूळ झाल्यास नवल काय? विचारांचा शोध विचारच घेत राहतात. जोपर्यंत स्वतःच्या वृत्तीचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं. सगळ्यांचच. तो शोध संपला, नक्की काय हवं होत ह्याचा शोध लागला कीं समानधर्मीयांचा शोध सुरु होतो. कारण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, निश्चित गरजांचा पत्ता लागला म्हणजेच संवादाची भूक वाढत जाते. ' गरजा ' आणि ' व्यक्तिमत्व ' हे शब्द खूप ढोबळ आहेत आणि काटेकोरसुद्धा. ' काही तरी हवं असणं' असं साधेपणाने म्हणता येईल. स्वतःचं स्वतःला सावडणं हे महत्वाचं. कोणत्याही गरजा कमी लेखायचं कारण नाही. स्वतःचा पत्ता स्वतःला सापडला म्हणजे मग वायफळ शब्दांनी भरलेला संवाद खपत नाही. शब्दही नेमके हवे असतात. नेमकेपणाला सगळंच ' नेमक' लागतं. हा अभिप्रेत असलेला नेमकेपणा कधी एकाच व्यक्तीत एकवटलेला गवसतो. कधी तो विखूरलेला आढळतो. निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात. ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध. ते स्थळ सापडलं कीं माणसं तिथं स्थिरावतात. "

वपुर्झा /152/Surendra / 20042025

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

" आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? "

" आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? " 

                           000o000

                "   काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तूला विसंवादाची वाळ्वी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतंच. इतक्या झपट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगलपत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगल पत्रिकेगणिक गणपती बाप्पा नावीन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्यापेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पोरोहित्य करणाऱ्या गुरुजींपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंस्कारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धीवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याचं हे विदारक उदाहरण. खरं तर सगळ्या मंगलकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत. ' श्रुती मंगल  थिएटर ', ' आनंद थिएटर ' असं म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटनच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायचं कौशल्य, अर्पणभाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागतो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? 

वपुर्झा /153/Surendra /15042025

" यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी."

"  यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी."

                          000o000

                "  अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? मला तसें वाटतं नाही. अपयश आलं कीं अवतीभोवतीच्या, प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते, कंठ फुटतो, कीं त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकू येत नाही. यश मिळाल कीं, गळा दाटून येतो. अपयश मिळालं कीं, गळाच दाबला जातो. अपयश पचवायला शिकायचं म्हणजे, स्वकीयांनीच केलेल्या वार पचवायला शिकायचं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा फुंकर किंवा फुत्कार पारखायची शक्ती वाढवायची, अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो ह्या सत्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची. यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी. सतत अस्तित्व दर्शवणारी. रांगोळीचा भुकेशी संबंध नाही. म्हणूनच ती पचवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारखं. अन्नावर वासना नसली तरी ते वाढणं गिळावं लागत. पचवावं लागतं. चेहऱ्याची रांगोळी विस्कटू न देता. " 

वपुर्झा /152/Surendra / 15042025

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

                           000o000

                "     सर्वात टॅलेंटेड माणसं त्या मानाने पटकन फसतात. अतिबुढीवादी म्हणून ती अगोदरच एकटी पडलेली असतात. भावनात्मक पातळीवरचा आक्रोश त्यांनी सतत दाबलेला असतो. हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात. They are intellectually attached to their sentiments. त्यामुळे त्यांना तृप्त व्हायला जसा वेळ लागतो तसाच त्या विश्वातून बाहेर पडायलाही विलक्षण प्रयास पडतो. दीर्घ काळ त्या भावनांचा इन्कार करत आल्याने ती जेव्हा त्या मागण्यांना वश होतात तेव्हा सामान्यांपेक्षा जास्त वेगाने वश होतात. पुन्हा पुन्हा फसतात, पुन्हा झगडा देतात. बुद्धीला खाद्य, बुद्धीला खाद्य असं कितीही मान्य केलं तरी त्याचा जबर थकवा असतो. तो थकवा घालवण्याची हाकाटी सुरु होते. तसं झालं कीं बुद्धी हेच ज्यांचं भांडवल अशी माणसं भांडवलशाही झुगारून देतात आणि बुद्धीला नं पटणाऱ्या गोष्टीच अधूनमधून करतात. सिगारेटपासून नाना प्रकारची व्यसन कमी न होता वाढतात का? तर त्याचं कारण हेच. मग सामान्य माणसं ह्याच असामान्य माणसाच्या सामान्य गोष्टींच अनुकरण करतात. उंची गाठणं ताकदीबाहेर. खोल जाण्यासाठी ताकद वापरावी लागत नाही. ग्रेव्हीटेशनल फोर्स ह्याही प्रांतात उपयोगी पडतो " 

वपुर्झा /152/Surendra /14042025

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

"  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

                           000o000

                "  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म. आयुष्य एक सातारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं, हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बिजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.  त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात. पैशाशिवाय. पक्षांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एकातरी पक्षाची हाउसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर अनेक अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपणहोऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतल हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.

वपुर्झा /151/Surendra / 03042025

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

" पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

                           000o000

                "  आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळाच इंद्रिय लागतं. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसंच निराळी. चार बुके शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी कधी मांडून ठेऊ असं होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात."

वपुर्झा /148/Surendra /02042025

" अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

"  अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

                           000o000

                "  कुवतीनुसार कलावंतांसाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खरं तर छोटी माणसं, मोठी माणसं असं काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की नुसतं ' राम ' हे नाव मोठ? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तुने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेले काम करायला हवं. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनाचा शोध लावणारा 

वॅट मोठा, हे कोण नाकारून? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅटपेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो असं रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्सपायी आपली साधी साधी कामं कशी रखडतात, हे आठवून पहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामं कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचंही स्मरण ठेवावं." 

वपुर्झा /147/Surendra / 01042025