मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य: सुरेखा सुर्यवंशी: _साडेसाती__चिंतन_* कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर

*_साडेसाती__चिंतन_*
 
_एका मैत्रीणीने संदेश पाठवला, "कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहीशील का?"_
     
_मी, "तुला साडेसाती सुरू झालीय का?" असे विचारले._ 
     
_त्यावर ती म्हणाली, "नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे."_
     
_मी म्हंटले," मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल."_
     
_त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, "झाला तुझा वाह्यातपणा सुरू?"_
     
_विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली,_ 
_कोणाची संपली?_
_कोणाची सुरू झाली?_ 
_काय म्हणून काय विचारता महाराजा, *"साडेसाती"!*_     
    
_मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे._
_शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते,_ 
_म्हणून त्या कालावधीला साडेसाती असे नाव पडले._ 
_ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तरी ती कोणालाही टाळता येत नाही._
 
_ज्योतिष मानत नाही, असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडातरी घाबरतो._ 
    
_एक गोष्ट आहे._ 
_शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की "आमच्यातले कोण छान दिसते?"_
    
_प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले,_ 
_"लक्ष्मी येताना छान दिसते_ 
_आणि_ 
_शनी महाराज जातांना चांगले दिसतात."_
      
_*शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही.*_ 

_दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते._ 
      
_देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की..._ 
_"मी सरांशी गप्पा मारून आलोच"_ 
_असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे._

_एकदा त्यांना विचारले,_
 _"तुम्हाला सर ओरडत नाहीत का?_ 
_चुका काढत नाहीत का?"_
     
_देशपांडे म्हणाला,_
_"ओरडतात."_
     
_मी: " तुम्हाला वाईट वाटत नाही का?"_
    
_*देशपांडे: "वाटतं..., मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते.*_ 
_पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे."_
     
_मी: "काय?"_
    
_देशपांडे:_ 
_"एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो._ 
_साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो._ 
_ते मला म्हणाले,_
 _"देशपांडे चला, चहा पिऊ."_
    
_चहा पितांना ते म्हणाले,_ 
_"देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो._

_*जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे.*_ 

_*घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.*_
 
_आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे?_ 

_गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात._ 

_*वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते,*_ 
_साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते._ 
_त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही."_
         
_शनी महाराज असेच असतात._ 
_*पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो,*_ 
_त्यात शनीचा दोष नाही._ 

_*शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो.*_ 

_साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते._ 
_माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो कारण व्हायचे ते होतेच._ 
_*कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो.*_ 

_*कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो.*_ 

_या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो._

_टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला._ 

_अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे._ 
         
_कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात._ 
_वेळ नसेल तर भिजत जायचे,_ 
_वेळ असेल तर थांबायचे,_ 
_ही निर्णयक्षमता साडेसातीत येते._

_चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते._ 
_भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते._
          
_चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही._ 
_आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो._ 

_*मला वाटले, माझ्या लक्षात आले नाही, इतकं चालतं, अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात.*_ 

_शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. *अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही.* अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे._ 

_गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात._ 

_शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही._

_हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात._
          
_डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं._ 

_*स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.*_

_घाबरावे असे शनी काही करत नाही._

_आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे._ 

_*त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही, ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.*_

_*माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे.*_ 

_गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात._ 

_गीता, एकंदरीत संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो._ 

_*ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो.*_ 

_खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो._
 
_अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात._
    
_आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते._ 
_साडेसातीत नाही तर एकूण आयुष्यातच..._
_मी म्हणीन ते,_ 
_मी म्हणीन तसे,_ 
_मी म्हणीन तेव्हा.._ 
_असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो._
_माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही,_ 
_होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही,_ 
_तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही,_ 
_तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही._ 
     
_एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते._ 
_आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते._
_तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते._ 
_मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले._ 
_*त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले.*_ 
    
_ही सत्यघटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ?_ 
_हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. *चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.*_
    
_साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते,_ 
_त्या संधीचे सोने करावे._ 
_*ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायाला लावतात,*_

_माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही._ 
_साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात._
 
_साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. *साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम.*_ 

_सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????_


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा